दोन मुलांचा केला होता खून : बल्लारपूर शहरातील घटनाचंद्रपूर : नात्यातील घराशेजारच्या दोन लहान मुलांचा क्रूरपणे खून करून नंतर पाण्याच्या टाक्यात बुडविण्याच्या आरोपाखाली बल्लारपुरातील सला नामक युवतीला शुक्रवारी चंद्रपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली. तब्बल पावणेतीन वर्षानंतर या घटनेचा निकाल न्यायालयाने दिला. त्यावेळी मृत मुलांच्या नातेवाईकांचे डोळे आठवणीने डबडबले.बल्लारपुरातील बालाजी वॉर्डात राहणाऱ्या सला आमनखाँ पठाण या १९ वर्षीय युवतीने आपल्या घराशेजारच्या नेहा खान (८) आणि शफाख खान (१०) या भावंडांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना १३ सप्टेंबर २०१३ ला सकाळी उघकडीस आली होती. या तरूणीच्या घराशेजारी राहणारे इस्त्राईल खान अब्दूल मुस्तझा खान यांनी सलाच्या वडिलांजवळ सलाच्या वर्तणुकीबद्दल चर्चा करून तिचे लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे ती ईस्त्राईल खान यांच्यावर चिडून होती. हा राग मनात ठेवून सूड उगविण्यासाठी तिने १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास या दोन्ही मुलांना एकापाठोपाठ एक आपल्या घरी बोलावून आधी त्यांना गळफास लावून ठार मारले. त्यानंतर पाण्याच्या टाक्यामध्ये दोघांनाही बुडविले. दोन्ही मुले बराच वेळ होऊनही घरी न आल्याने सलाच्या घरी जावून बघीतले असता हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी सलाला ताब्यात घेवून अटक केली होती. बल्लारपूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी यांनी या घटनेचा तपास करून साक्षीपुरावे न्यायालयापुढे सादर केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. आर. अग्रवाल यांनी या प्रकरणी सर्व साक्षीपुरावे तपासून शुक्रवारी सलाला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील म्हणून संजय मुनघाटे यांनी काम सांभाळले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती. (जिल्हा प्रतिनिधी)
दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपीला जन्मठेप
By admin | Updated: May 14, 2016 00:50 IST