सचिन सरपटवारलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वर्धा (सेवाग्राम) ते बल्लारशा दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी भद्रावती तालुक्यातील आठ गावांमधील ६७.६८ हेक्टर शेतजमीन शासनातर्फे संपादित करण्यात येणार आहे. नुकतीच रेल्वे विभागातर्फे जागेची मोजणी करण्यात आली आहे.कुरोडा, विजासन, गवराळा, देऊळवाडा, वडाळा रीठ, नंदोरी बु. घोडपेठ येथील ७.६८ हेक्टर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असून, खासगी जमिनीचे भूसंपादन किंवा थेट खरेदी विक्री व्यवहार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यामार्फत होणार आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, एक ते दोन शेतकऱ्यांचे जमिनीबाबत थेट खरेदी व्यवहार असल्याची माहिती आहे. खासगी जमिनीत सिंचन व्यवस्था, बोरवेल, विहीर, शेततळे, आदी असल्यास ओलिताखालील जमिनीसाठी शासनाचा दर मोठ्या प्रमाणात मिळणार असून, शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. शेतातील गोठा, तारेचे कुंपण, सागवान झाड, निलगिरी झाडे या संपादित क्षेत्रातून गेले असल्यास याचा वेगळा मोबदला मिळणार आहे.भूसंपादन अधिकारी यांनी तिसरी रेल्वेलाईन व विंजासन तथा देऊळवाडा येथील उड्डाणपूल संबंधातील लाभार्थी शेतकऱ्यांना आक्षेप अर्ज मागवीले होते. त्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी भूसंपादन अधिकारी सुभाष शिंदे व तहसीलदार अनिकेत सोनवणे व त्यांचे पथक, तसेच रेल्वे अधिकारी यांच्या समक्ष शनिवारी देऊळवाडा रेल्वे फाटक ते गवराळा रेल्वे फाटक येथील सर्व संपादित जमिनीला भेटी दिल्या. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली.