नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची
चंद्रपूर : नियमबाह्य व विना परवाना अल्पवयीन वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहन चालवीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. मात्र पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
उघडे चेंबर ठरताहेत धोकादायक
चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. येथून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
सिग्नल बंदमुळे अपघाताची भीती
चंद्रपूर : शहरातील मिलन, वडगाव चौकातील वाहतूक दिवे बंद असल्याने विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देऊन सिग्नल सुरू करणे गरजेचे आहे.
वाहन पार्किंगसाठी फूटपाथचा वापर
चंद्रपूर : येथील महात्मा गांधी, कस्तुरबा रोड ते पठाणपुरा गेटपर्यंत तसेच वडगाव परिसरात फूटपाथवर वाहन पार्किंग केल्या जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही प्रभागात सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर विजेचा कमी-अधिक दाब होत असल्याने अनेक उपकरणे बंद-चालू होत असतात तर काहीवेळा एका फेजची वीज राहत नाही. याबाबत येथील नागरिक वीज कंपनीकडे तक्रार करतात. मात्र वेळीच उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
दाताळा परिसरात शेणखताचे ढिगारे
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या दाताळा गावपरिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेलाच शेणखताचे ढिगारे असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. शेणखताचे ढिगारे उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्ख्या वाढत असून नागरिक वाट्टेल तिथे घरे बांधत आहे. शासकीय जमिनीवरही अनेकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते तसेच शासकीय जागा मोकळ्या करण्याची मागणी केली जात आहे.
रोजगार उपलब्ध करण्याची मागणी
चंद्रपूर : औद्योगिक शहर अशी चंद्रपूरची ओळख आहे. मात्र बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे वाॅर्डनिहाय बेरोजगारांची नोंदणी करून त्यांच्या हाताला काम देण्याची मागणी केली जात आहे.
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
चंद्रपूर : शहरातील बंगाली कॅम्प, बाबूपेठ आदी ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती नाही
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. मात्र वेळीच दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
शाळांना वाहनतळच नाही
चंद्रपूर : शहरातील काही खासगी शाळांना वाहनतळ नसल्याने विद्यार्थी अगदी रस्त्यावरच सायकल ठेवत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने तसेच वाहतूक पोलिसांनी या शाळांवर कारवाई करून वाहनतळ उभारण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
कचरा ट्राॅली दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जात आहे. मात्र काही वॉर्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला कचरा ट्राॅली दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.