मूल : मूल शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसात अतिशय दुरवस्था झाली असून सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता पार करताना नागरिकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता मूल शहरातील असला तरी ग्रामीण भागाला जोडणारा असल्याने नागरिकांची रस्त्यावर मोठी वर्र्दळ असते.हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अख्त्यारित येतो. असल्याने नगर परिषद प्रशासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकमेंकाकडे बोट दाखवून वेळ मारुन नेत असल्याचे दिसून येते. मात्र सदर मार्गावरुन मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.मूल-नागपूर महामार्गावरुन श्रीराम टॉकीज ते ताडाळा रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन चालताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. विसर्जनाच्या वेळी रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दरवर्षी नगर परिषद या मार्गावर मुरुम टाकून डागडुजी करून तात्पुरती सोय करते. मात्र यावर्षी नगर परिषदेने याविषयातून अंग काढून घेतल्याने या रस्त्याची डागडुजी होईल की, नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी नगर परिषद रस्त्याच्या डागडुजीसाठी अनुदान मंजूर करते. त्याद्वारे सर्व वॉर्डात मुरुम टाकला जातो. मात्र मुरुम मंजूर होईपर्यंत पावसाळा निघून जातो, असा अनुभव आहे.( तालुका प्रतिनिधी)
मूल शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे
By admin | Updated: August 7, 2014 23:53 IST