चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना सुरू केल्या. मात्र, यातील अनेक योजना बंद करण्यात आल्या आहे. त्यातच उज्ज्वला योजनेमुळे शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडणीत वाढ झाली आहे.
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरून महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करून घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला; पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने शेवटी गरीब जनता सरपण गोळा करून स्वयंपाक शिजवत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरपण पेटविण्यासाठी केरोसीनची आवश्यकता आहे. केरोसीन मिळविण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पूर्वी शेतकरी शेतात जागल करण्यासाठी केरोसीनचा दिवा, कंदिलाचा वापर करीत होते. मात्र, केरोसीन बंदीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या थोडी हवा जरी आली तरी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे खेड्यातील जनतेला वीज येईपर्यंत अंधाराचा सामना करावा लागत आहे. केरोसीन बंदीमुळे दिवा, कंदिलाचा उपयोग होताना दिसत नाही. सामान्य कुटुंबातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे.