जागोजागी खड्डे : पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : नागभीड-ब्रह्मपुरी रस्ता म्हणजे डोकेदुखीच. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे बांधकाम ऐन पावसाळ्यात केले जात असल्याने आखून दिलेल्या रेषेच्या आत वाहन चालविताना हा प्रवास जीवघेणा ठरत आहे़मागील वर्षापासून या राज्यमार्गाची अवस्था दयनीय असताना यावर्षी हा रस्ता राज्यमार्गातून राष्ट्रीय मार्गात रुपांतरित झाल्याने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम सुरू असल्याने एक प्रकारची लक्ष्मणरेषा आखण्यात आली आहे. या लक्ष्मणरेषेच्या बाहेर वाहनधारकांना जाता येत नाही़ परंतु ज्या पूर्वीच्या डांबरीकरणावरून वाहतूक सुरू आहे, त्या डांबरीकरणावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालविताना दमछाक होत आहे़ या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. अशा स्थितीत सध्या हा रोड वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ लोंडीग ट्रक या मार्गावरून चंद्रपूर, नागपूर, रायपूर, जवलपूरकडे जात असताना लहान वाहनधारकांना त्यांच्यापासून सतर्क राहून आपली वाहने चालवावी लागत आहे़ किमान पूर्वीच्या डांबरीकरणावर डांबर लावून तो रस्ता योग्य बनविणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाचे काम करण्यासाठी खोदकाम केले असल्याने वाहन कुठून व कसे चालवावे, हा प्रश्न निर्माण होत आहे़ वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावरच मोठे पाईप टाकण्यात आल्याने अर्धा रस्ताच बंद झाला आहे. या मार्गावरून गंभीर रुग्ण नागपूरला रवाना करताना रस्त्याच्या दैनावस्थेमुळे रूग्ण आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सायकल किंवा दुचाकी वाहनधारकांना तर मोठी कसरत करावी लागत आहे. महागड्या चारचाकी वाहनांची तर एैसीतैसी होत आहे़ या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनधारक संतापले आहेत. रस्त्याच्या अशा दैनेमुळे अपघात होऊन एखाद्याचा बळी गेला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किमान सुरू असलेल्या रस्त्याची डागडूजी करून रस्ता वाहन चालविण्यायोग्य बनवावा.
ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्याचा प्रवास झाला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:12 IST