फोटो
मयूर एकरे
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव ग्रामपंचायतअंतर्गत येणारी जवळपास संपूर्ण मालमत्ता पैनगंगा वेस्टर्न कोल फिल्डने संपादन केली आहे. त्यावेळी तेथील कित्येक घर व प्लॉटधारकांना ३ लाख रुपये अशाप्रकारे सरसकट अनुदान दिल्याची माहिती आहे. आता मात्र वेकोलि यातील काही खाली प्लॉटची अतिशय तुटपुंजी किंमत देत असल्याने सदर प्लॉटधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पुनर्वसित गावात वेकोलि प्रशासनाने घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा प्लॉटचा पूर्वीप्रमाणेच योग्य मोबदला द्यावा, तुटपुंजी किंमत देऊन थट्टा करू नये, जागा संपादित करू देणार नाही, यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा मारोती पिंपळकर, गोसाई गैखरे, रवी करमरकर, मोतीराम करमरकर या प्लाटधारकांनी दिला आहे.
विरूर गाडेगाव येथील पैनगंगा कोळसा खाणीकरिता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी वेकोलिने संपादित केल्या आणि त्याचा मोबदलाही त्यांना देण्यात आला. ग्रामपंचायत विरूर (गाडे)च्या पुनर्वसनास २०१८-१९ मध्ये सुरुवात झाली. त्यापैकी गावातील ४०४ कुटुंबांच्या पुनर्वसनधारक कुटुंबांपैकी जवळपास ८० टक्केच पुनर्वसन झाले असून, २० टक्के कुटुंब अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्वसनाच्या अनुषंगाने ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला होता. ठरावानुसार ४०४ कुटुंबांपैकी तीनशेहून अधिक कुटुंबांना रकमेच्या स्वरूपात मोबदला देण्यात आला आणि ते गाव सोडून बाहेर गावाला निघून गेले.