पोंभूर्णा येथील प्रकार : काचाची तावदाने व टिन पत्रे लावण्याची मागणीपोंभूर्णा: तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पोंभूर्णा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भव्य इमारत बांधण्यात आली. परंतु मे महिन्यात आलेल्या वादळी पावसाने कार्यशाळा क्रमांक दोनला लावण्यात आलेली काचेची तावदाने व टिनाची पत्रे उडून गेलीत. काही पत्रे तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाने या इमारतीत गळती सुरू झाली. परिणामी प्रशिक्षण हॉलमध्ये पाणी साचल्याने प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. या ठिकाणी ग्लासेस व टिनपत्रे लावून पावसाची गळती थांबवावी, अशी मागणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य वाघमारे यांनी गोंडपिपरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे केली आहे.पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासीबहुल समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने पोंभुर्णा येथे सन २००७ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली. पूर्वी हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र खासगी इमारतीमध्ये किरायाने सुरू होते. त्यामुळे त्याठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा व इतर सोयी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हत्या. याची दखल घेऊन या क्षेत्रातून तीनदा निवडून आलेले व सध्या मंत्रीपदावर कार्यरत असलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून पोंभुर्णा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यशाळा बांधकाम इमारतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला. त्या नुसार गोंडपिपरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पोंभुर्णा-देवाडा (खुर्द) या मुख्य रस्त्यालगत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यशाळेचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर किरायाने असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे ३१ जानेवारीला नवीन बांधकाम करण्यात आलेल्या शासकीय इमारतीमध्ये सदर केंद्राचे स्थानांतर करण्यात आले. सदर इमारतीचे उद्घाटनसुद्धा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले होेते. परंतु पाच कोटी रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम पाहिजे दर्जाचे झाले नाही. मे महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यशाळा क्रमांक दोनवरील काचाचे तावदान व टिनाची पत्रे दूरवर उडून गेलीत. काही पत्रे अर्धवट तुटली. त्यामुळे येथील कार्यशाळा क्रमांक दोनमधील प्रशिक्षण हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने गळती लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पाणी साचल्याने काही वेळ प्रशिक्षणार्थ्यांना आपले काम बंद ठेवावे लागले. एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये अल्पश: पाण्यामुळे गळती होत असेल तर मोठ्या स्वरुपाचा पाऊस पडल्यास याठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल, असा सवाल या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.गळती होत असलेल्या ठिकाणी काचाची नवीन तावदाने व टिनाची पत्रे लावण्यात यावी, यासाठी येथील प्राचार्य वाघमारे यांनी गोंडपिपरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाला २६ मे रोजी लेखी निवेदन सादर केले. परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने काचेची तावदाने व टिनपत्रे लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. कार्यशाळा इमारत क्रमांक दोनमधील प्रशिक्षण हॉलमध्ये पाणी साचत असल्याने प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना होणारी अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तात्काळ टिनपत्रे व काचेची तावदाने बसवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात पाण्याची टंचाईपोंभुर्णा येथथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेला बोअरवेल पंप अल्पावधीतच म्हणजे केवळ एक वर्षातच जळाला असल्याने या ठिकाणी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व कार्यरत कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरूनच बॉटलमध्ये पिण्यासाठी पाणी घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे सदर बोअरवेल पंप तात्काळ दुरुस्त करुन प्रशिक्षणार्थ्यांना पाण्याची सोय करुन देण्यात यावी, अशी प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे.
आयटीआयला लागली गळती
By admin | Updated: July 24, 2015 01:00 IST