योगेश दुधपचारे : घुग्घूस येथे पर्यावरण चर्चासत्रचंद्रपूर : पर्यावरणाच्या संदर्भात चंद्रपूर जिल्हा सर्वात प्रदूषित जिल्हा असून घुग्घुस औद्योगिक क्षेत्र त्यातही अग्रेसर आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालणे ही आपणा सर्वांनी अग्रक्रमाने पार पाडावयाची जबाबदारी आहे. शासनावर या कामाची सर्व जबाबदारी सोपूवन स्वत:ला नामानिराळे ठेवण्यापेक्षा प्रत्येकाने प्रदूषण निर्मूलनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यातही विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी विशेषत्वाने पार पाडली पाहिजे, असे मत पर्यावरणवादी प्रा. योगेश दुधपचारे यांनी व्यक्त केले. घुग्घुस जनता कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित पर्यावरणविषयक चर्चासत्रात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्याम धोपटे होते. ते पुढे म्हणाले, या देशात पर्यावरण संवर्धनाचे काम सामान्य नागरिकांनी केले आहे. सुंदरलाल बहुगुणा, डॉ. सलीम अली, मेधा पाटकर, बाजारगावचे पाटील डॉ. दीक्षित अशी कितीतरी नावे सांगता येतील. या सामान्य माणसांनीच मोठी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे माझ्यामुळे काय फरक पडेल, असे न म्हणता आपण स्वत:पासूनच पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू करावे म्हणजे हा प्रश्न सोडविणे शक्य होईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक व्ही.टी. पोले यांनी तर संचालन ज्ञानेश्वर सोनकुसरे तर आभार प्रा. रवी उईके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
प्रदूषणाला आळा घालणे सर्वांची जबाबदारी
By admin | Updated: August 27, 2015 01:15 IST