चार वर्ष लोटले तरी कामे सुरूच : कंत्राटदाराची मनमानी
नागभीड : गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेच्या अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र ते काम संपायचे नाव घेत नाही. कंत्राटदारापुढे येथील सार्वजनिक बांधकाम विभागासह नगरपरिषद ही हतबल झाली आहे. या रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल येथे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या काळात बनविण्यात आलेल्या नागभीडच्या रस्त्यांची एकंदर हालत लक्षात घेऊन या रस्त्यांचे पुनरूज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. याठिकाणी नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच लोकनियुक्त कार्यकारी मंडळ पदारूढ झाले. या कार्यकारी मंडळाने हे रस्ते आणि नालीच्या कामास प्राधान्य देऊन ही कामे अग्रक्रमाने प्रस्तावित केली. शासनाकडूनही या रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला. मात्र आश्चर्याची बाब अशी की,निधी मंजूर झाल्यानंतरही प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कामास सुरूवात करण्यात आली. येथील सिनेमा चौकापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. आता नुकतेच येथील जुन्या गो. वा. महाविद्यालयापासून तर गोरोबा चौकातील रस्ता पूर्ण आणि जुन्या कन्या शाळेकडे जाणारा रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले. उर्वरित रस्त्यांच्या कामाचा अद्यापही ठावठिकाणा नाही.
सद्यस्थितीत या रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यांनी ये जा करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या रस्त्यांवरून जड वाहनांची ये जा सुरू राहत असल्याने या त्रासात आणखीच भर पडत आहे.
ही अवस्था केवळ एकाच रस्त्याची नाही तर नागभीडमधल्या बहुतेक रस्त्यांची आहे. आता तर या रस्त्यांवर चांगलेच खड्डेही पडले आहेत.या अर्धवट कामामुळे लहान लहान अपघातही घडल्याची माहिती आहे. सा. बां. विभागाने कंत्राटदारास आणि नगरपरिषद प्रशासनाने सा. बां. विभागास खरोखरच धारेवर धरून काम करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट
सा. बां. विभागाने कंत्राटदारावर वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. केवळ सा. बां. विभागाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार घडत आहे. सा. बां. विभागाने कंत्राटदाराकडून काम काढून ते नगरपरिषदेकडे सोपवावे. नगरपरिषद चार महिन्यात काम पूर्ण करेल. या कामात नगरपरिषदेला नाहक मुस्कटदाबी सहन करावी लागत आहे.
- सचिन आकूलवार, बांधकाम सभापती.
कोट
नागभीडच्या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. याला जबाबदार कंत्राटदार तर आहेच, पण त्याचबरोबर सा. बां. विभाग व न. प. प्रशासनही जबाबदार आहे. कंत्राटदार बदला अशा सूचना वारंवार केल्या आहेत. पण न. प. प्रशासन कंत्राटदाराविरोधात शब्दही काढायला तयार नाही.
- प्रतीक भसीन , नगरसेवक,नागभीड.