ब्रह्मपुरी : शहरात टॉवर उभारण्याची परवानगी नसताना पुन्हा नव्याने तीन टॉवर उभारण्यात येत आहे. टॉवर कंपनीच्या या मनमानीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुरी शहरात चारही बाजुने विविध कंपन्यांनी मोबाइल टॉवर उभारले आहेत. यावर रात्रभर माकडांचे वास्तव्य असते. ही माकडे दिवसा परिसरात धुमाकूळ घालून मोछे नुकसान करीत आहेत. एकदा टॉवर उभारून कंपनी मोकळी होते. अशावेळी मोबाईल टॉवरच्या परिसरात पसरणारी घाण, त्यावर वास्तव्य करणाऱ्या माकडांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत संबंधित कंपन्या टॉवर वाऱ्यावर सोडून पुन्हा नव्या टॉवरच्या निर्मितीच्या मागे लागल्या आहेत. शहरात पुन्हा नव्यान तीन टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. परंतु या तिन्ही टॉवरला नगर परिषदेची परवानगी नसल्याची माहिती ‘लोकमत’ ला मिळाली आहे. यापूर्वी शहरात जे टॉवर उभारण्यात आले आहेत, त्यांचीच सुरक्षा अपूर्ण असताना पुन्हा नव्याने टॉवर उभारण्याची गरज कंपन्यांना भासली आहे. जुन्या टॉवरवर सुरक्षा गार्ड ठेवून त्या परिसराची देखभाल करण्याची सक्ती प्रशासनाने करावी, अन्यथा असे वाऱ्यावर सोडलेले टॉवर बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटने घालून दिलेले नियमही कंपन्या धाब्यावर बसवून परवानगी घेण्यात यापूर्वी यशस्वी झाल्या आहेत. असे असताना या टॉवरविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी शहरात अनधिकृत टॉवरचा सुळसुळाट
By admin | Updated: November 7, 2015 00:46 IST