चंद्रपूर : विना परवाना आणि नियमांचे उल्लंघन करून पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला न्यायालयाने सहा महिन्याच्या कारावासासह तब्बल पाच लाखाचा दंड ठोठावला आहे. बलवंत रामटेके असे या व्यावसायिकांचे नाव असून न्यायालयाच्या निर्णयाने अवैध पॅकिंग वाटर आणि जार विकणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.बलवंत रामटेके यांनी एमआयडीसीमध्ये अॅक्वा चिल्ड प्लॅन्ट उभारला होता. या प्लॅन्टमधून तो पाणी पॅकिंग करून आणि जारमधून विकत होता. दरम्यान रामटेकेचा अॅक्वा चिल्ड प्लॅन्ट विनापरवाना चालत असून अवैध असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. प्लॉन्टवर धाड घालून प्लॉन्टची चौकशी केली असता प्लॉन्ट अवैध आणि विनापरवाना चालत असल्याचे उजेडात आले. २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी अशोक कुळकर्णी यांच्या न्यायालयाने बलवंत रामटेकेवर अन्न सुरक्षा विभागाने लावलेले आरोप सिद्ध करीत सहा महिन्यांचा कारावास व पाच लाखांचा दंड आणि दंड न अतिरिक्त कारावास ठोठावला.
अशुद्ध पाणी विकणाऱ्याला कारावास
By admin | Updated: August 22, 2015 01:26 IST