चंद्रपूरः जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने बिबट संवेदनशील गावामधुन बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबवावी, अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
जंगलालगतची किंवा जंगलव्याप्त गावातील जंगलावर निर्भरता असणारे गावकरी, गुराखी दाट जंगलात, वाघांच्या अधिवासात गेल्यानंतर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू किंवा जखमी होतात. मात्र ‘बिबट’ सारखा वन्यप्राणी थेट गावात येतो, बिबटाचे खाद्य निर्भरता गावात पूर्ण होत असल्याने गावालगत त्याचा वावर असतो. त्यामुळे गावात, गावालगत किंवा शेतशिवारात बिबटयाकडुन मानव मृत्यू किंवा जखमीच्या घटना सातत्याने होतात. यातुनच मानव-वन्यप्राणी सघर्ष वाढतो. मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी बिबट समस्यामुक्त ग्राम ही योजना राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्षास कारणीभुत असलेले वाघ-बिबटच्या अनुषंगाने वनविभाग व जिल्हा प्रशासनाकडे संघर्ष निवारण्याच्या अनुषंगाने मागील काही वर्षापासुन इको-प्रो संस्था प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणुन वर्ष २०१८ ला ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ या योजनेची संकल्पना इको-प्रो कडुन ठेवण्यात आली. याबाबत वेळोवेळी वनविभाग, जिल्हा प्रशासनासमोर सादरीकरण केल्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सुध्दा सादरीकरण करण्यात आले. त्यांनतर ही योजना जिल्हा परीषद, चंद्रपूर तर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बाॅक्स
सध्यास्थीतीत ब्रम्हपुरी परिसरात बिबट संघर्षात नुकताच दोन महिलांना जीव गमवावा लागला. चंद्रपूर जिल्हयात मागील बारा वर्षात बय्ट्याच्या हल्ल्यात ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. या सर्व घटना गावात किंवा गावालगत झाल्या आहेत. बिबटचा नेमका वावर हा गावालगत राहत असल्याने, गावावर त्याची निर्भरता असल्याने, गावासभोवताल तयार झालेले झाडी-झुडपे वाढून बिबटयास पोषक असे अधिवास निर्माण झाल्याने होत आहे.
बाॅक्स
चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हासोबतच आता ‘व्याघ्र जिल्हा’ आहे. जिल्हयातील जगविख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह सर्वाधिक वाघ असल्याचे भुषणावह बाब आहे. मात्र वाढते वाघ व वन्यप्राणी सोबतच वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष आता या जिल्हयाचा चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्हयात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे.