महाराष्ट्र शासनाने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा दारू विक्रीतही सर्वात पुढे होता. त्यामुळे शासनाला या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त होत होता. शिवाय दारू दुकानदाराच्या आश्रयाने अनेक छोटे-मोठे दुकानदार बाजारातील जिन्नस विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत जीवन जगत होते. अशा जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि तातडीने अंमलबजावणी ही करण्यात आली. मात्र तेवढ्याच वेगाने जिल्ह्यात अवैधरित्या बनावट दारूची तस्करी सुरू झाली. आता काही गब्बर दारू विक्रेते स्वतः बनावट दारू निर्माण करून कमी भावात विकण्याचा गोरखधंदा सुरू केला असून अनभिज्ञ नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा एक अघोरी प्रयोग अलिकडे सुरू झालेला आहे. प्लॅस्टिकच्या छोट्या बाटलीमध्ये ही बनावट दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. शिवाय काही गावांमध्ये मोहफुलांची बनावट दारूही विकल्या जात आहे. या दारूमध्येसुद्धा वेगवेगळ्या विषारी वस्तू टाकल्या जातात. यामुळे स्लो पायझन युक्त बनावटी दारू पिल्याने सावरगाव, तळोधी, नांदेड, बाळापूर, गोविंदपूर,
कोजबी, वाढोणा आदी परिसरातील अनेक तरुण दारूच्या अतिसेवनाने किडनी, लिव्हर निकामी होऊन पोटात जल निर्माण होऊन मरण पावले आहेत. सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या बनावट दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी व तळोधी पोलिसांनी आतातरी कठोर पावले उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे.
कोट
वाढोण्यात नुकतेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत प्रशासन कार्य करीत आहे. गावकरी व महिलांची साथ मिळाली तर दारूबंदीवर आळा घालण्यात येईल.
- देवेंद्र गेडाम
सरपंच, ग्रामपंचायत, वाढोणा ता. नागभीड