वरोरा : महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या व झुडपी जंगल म्हणून नमुद केलेल्या जागेवर शेकडो टन राख पसरविण्यात आली आहे. ही राख पाण्यात मिसळत असून हवेद्वारे पसरत असल्याने मानवासह प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महसूल विभागाच्या जागेवर राख पसरविण्यात आली आहे, मात्र याबाबत महसूल विभागच अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महसूल तसेच वनविभागाच्या ताब्यात असलेली व त्यात झुडपी जंगल म्हणून नमूद केले असेल तर ही जागा वनसंवर्धन अधिनियम १९८० चे कलम २ अन्वये वनेत्तर वापरण्यासाठी देता येत नाही. याचे अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. असे असताना भद्रावती तालुक्यातील भटाळी गावानजीकच्या व सध्या महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या सर्व्हे क्रमांक ४३ व ५३ मध्ये झुडपी जंगल असे सातबाऱ्यावर नमुद केले आहे. शेकडो टन राख टाकत असताना ही राख ट्रक तसेच टिप्परद्वारे टाकण्यात आली. राख टाकण्याकरीता कित्येक दिवसाचा कालावधी लागला. परंतु, महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या व झुडपी जंगल नमुद असलेल्या जागेवर शेकडो टन राख टाकुन त्यावर मुरूम टाकण्यात आला, याची साधी कल्पना महसूल विभागाला नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राख टाकण्यास कोणी पुढाकार घेतला व ती राख महसूल विभाग काढणार काय, यामध्ये दोषी असणाऱ्यावर कार्यवाही होईल काय, असे एक ना अनेक प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)मुरूम टाकून राख दाबण्याचा प्रयत्नकाही महिन्यापुर्वी शेकडो टन राख पसरविण्यात आली. त्यावर मुरूम पसरवून राख दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. या झुडपी जंगल जागेवर मोठ मोठे खड्डे होते. त्या खड्डयातही ही राख पसरविण्यात आली आहे. ही राख खड्ड्यातील पाण्यात मिसळत असल्याने पाणी दुषीत झाले आहे. हे दुषीत पाणी पाळीव प्राणी पिल्यास त्यांना धोका निर्माण होणार आहे. राख भरलेल्या ठिकाणी दलदल निर्माण झाली असून या जागेवरून चालणारी व्यक्ती किंवा जनावरे राखेत गडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. झोपडपट्टीधारकांना त्रासराख टाकलेल्या ठिकाणच्या काही अंतरावर गिट्टी खदानमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या आहेत. हवेमुळे राख त्यांच्या झोपड्यात तसेच पिण्याच्या पाण्यातही मिसळत असल्याने या मजुरांना श्वसनाचे आजार होणे सुरू झाले आहे. या राखेमुळे भटाळी परिसरातील शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. पशुपक्षावरही या राखेचा विपरीत परिणाम झाल्याचे परिसरात फिरताना आढळून येते. राखेमुळे जैवविविधता भटाळी परिसरातील नष्ट होण्याचे संकेत दिसुन येत आहे.
झुडपी जंगलाच्या जागेवर पसरविली शेकडो टन राख
By admin | Updated: August 14, 2015 01:18 IST