प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : राजेश बेले यांचा आरोपचंद्रपूर : इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले, गड, मंदिरे जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. चंद्रपुरातील परकोट, गोंड राजाची समाधी आणि शहरासभोवतलाही ऐतिहासीक प्राचीन वास्तू चंद्रपूरचे ऐतिहासीक वैभव सांगत आहेत. मात्र, मागील काही वर्षापासून परकोटालगत होत असलेले अतिक्रमण चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक वैभव नष्ठ करीत आहे.शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पत्रपरिषदेत केला. चंद्रपूरचा इतिहास इ.स. १४६१ ते १५७२ पासूनचा आहे. अनेक गोंडकालीन राजांनी येथे राज्य केले. भद्रावती, बल्लारपूर, माणिकगड येथे इतिहासाची पुरावे सापडतात. चंद्रपूर गोंड राजाची राजधानीच होती. प्राचीन चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहराच्या सभोवताल परकोट असून चार मुख्य प्रवेशद्वार, आठ खिडक्या आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर आणि गोंड राजाची समाधी याचे अस्तित्व आजही शहरात बघायला मिळत आहे. मात्र परकोटालगत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. आजही अनेक ठिकाणी परकोट तोडून अवैध बांधकाम सुरु आहेत. दिवसाढवळ्या हे बांधकाम होत असतानाही महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागही निमुटपे पाहत आहे. या अतिक्रमणामुळे शहराचे ऐतिहासीक वैभव नष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अतिक्रमणामुळे नष्ट होतेय ऐतिहासिक वैभव
By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST