यावर्षी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये तरुणवर्ग निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे नवे तंत्रज्ञान अवलंबिले जात आहे. आपल्या जवळचे कोण, दूरचे कोण याचा अंदाज लावला जात आहे. आपल्याकडील कार्यकर्ते दुसरीकडे भटकू नये यासाठी बॅनरवर सर्वांचेच नाव देण्याचा उमेदवार प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, अनेकांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आपल्या सोयीच्या उमेदवाराचा प्रचार करणे सुरू केले आहे.
सध्या शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांच्याच हाती मोबाईल आला आहे. त्यातच ॲन्ड्राईड मोबाईलमुळे अनेकांना प्रचार करणे अगदीच सोपे झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार हायटेक बनला आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांकडून काही कार्यकर्ते मोबाईल रिचार्ज मारून घेत असून त्याचा प्रचार करण्यासाठी गावातील प्रत्येकांच्या मोबाईल व व्हॅटसॲपच्या माध्यमातून आपल्याच उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत.
--
कोण जिंकणार कोण हरणार?
निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. त्यामुळे गावातील काही राजकीय विश्लेक्षक कोण जिंकणार, कोण हरणार, याचा अंदाज घेत आहेत. कुणाला कुणाची मदत, कोण कशी तयारी करतोय, कुणाच्या मागे कोणता परिसर अशा अनेक चर्चांना सध्या वेग आला आहे.
बाॅक्स
अनेकांचा हिरमोड
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी शासनाने सातवी पासची अट घातली आहे. त्यामुळे गावातील काही राजकीय नेत्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातचही सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार आहे. त्यामुळे खर्चासंदर्भातही मागेपुढे बघितल्या जात आहे.
बाॅक्स
गावात निवडणूक शहरात खर्च
ग्रामपंचायतीची निवडणूक गावात होत असली तरी उमेदवार कार्यकर्त्यांवर शहरात खर्च करताना दिसत आहे. अनेकांना मोबाईल डाटा, रिचार्ज मारून दिल्या जात आहे. तर रात्री हाॅटेलमध्ये पार्ट्यांनाही ऊत आला आहे. विशेषत: गावाबाहेरील धाब्यांवर सध्या रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगत आहेत.