आशिष देरकर - गडचांदूरगडचांदूर शहर व परिसरातील इतर गावांचा विचार केल्यास येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कधीकधी तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागाच उपलब्ध नसते. विविध औषधींचा तुटवडा व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गडचांदुरातील आरोग्य सेवा आजही कोलमडलेली आहे.गडचांदूर औद्योगिक परिसर असल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. दोन-तीन डॉक्टर सोडल्यास खासगी दवाखाने दर्जेदार नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला गडचांदुरात महत्व आहे. खासगी दवाखान्यात उपचार केल्यास हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे रुग्ण ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. मात्र गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. त्यामुळे रुग्णांना गडचांदूर रुग्णालयाबद्दल विश्वासार्हताच नाही.येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. कुत्रा चावला तर ‘रेबीज’ची लस मिळेल याची शाश्वती नसते. रूग्णाला औषधाच्या दुकानातून ती विकत आणावी लागते. बाळंतपणात तर ‘सिझेरियन’ची नवी पद्धत अलीकडे आली आहे. गरिबाला ते परवडणारे नसते. ग्रामीण रुग्णालयात ती सुविधा नसते. अशावेळी जिल्ह्याच्या ठिकाणी वशिला लावूनच रूग्ण न्यावा लागतो. गरीब रुग्णांसमोर अशावेळी फार अडचण निर्माण होते.मोठ्या संख्येने येथे रुग्ण येत असले तरी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांची संख्या वाढली तर डॉक्टरांचीसुद्धा फजिती होते. कित्येकदा एकाचवेळी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उपचारात कमी-जास्त झाल्यास संपूर्ण दोष मात्र डॉक्टरांना दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. त्यामुळे पैशाचा तुटवडा असला तरी लहान बालक, हृदयरोग, मेंदूविकार, अपघाती रुग्ण अशा किती तरी आजारासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयच गाठावे लागते.
गडचांदुरातील आरोग्य सेवा कोलमडली
By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST