चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष समस्या डोके वर काढू पाहात आहे. या समस्येची तीव्रता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त सोशल अॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट (सार्ड) चंद्रपूर या ग्रामीण विकास व वन्यजीव क्षेत्रात सदैव कार्य करणाऱ्या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील पारोधी येथील २० युवकांना प्रत्यक्ष जंगलात नेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या भाणूसखिंडी येथे एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे आणि प्रा. योगेश दुधपचारे उपस्थित होते. प्रा. डॉ. दुधपचारे हे आपल्या भाषणात म्हणाले, २००२ पासून २०१५ पर्यंत १३५ मानवांचा मृत्यू मानव वन्यजीव संघर्षात झाला आहे. त्यापैकी ६२ लोक हे वाघ आणि बिबट यांच्या हल्ल्यात तर १७ लोक रानडुकरांच्या हल्ल्यात मारल्या गेले आहे. ९५ टक्के मृत्यू जंगलात झालेले आहे. त्यामध्ये फक्त ६ लोकांचा मृत्यू कोअर भागात तर जास्तीत जास्त मृत्यू बफर व इतर भागात झालेले आहेत. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. मोहफुले आणि सरपणाच्या काड्या आणण्यासाठी महिल्या जंगलात जात असल्यामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी ही समस्या वाढण्यामागे मानवसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आपण नियमांचे पालन करीत नाही. जंगलातील आपला वाढणारा हस्तक्षेप कारणीभूत ठरत असल्याचे पटवून दिले. जंगलात अंधार पडल्यावर जाऊ नये. जंगलात खूप अंतर आत जाऊ नये, एकट्याने जाऊ नये, टेंभुर, मोह, जांभुळ, सरपनाच्या काड्या याचा अतिमोह करु नये, असे महत्वाचे मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)
सार्डतर्फे मानव वन्यजीव संषर्घावर मार्गदर्शन
By admin | Updated: August 2, 2015 01:15 IST