भद्रावती : जिल्ह्यातील ११ नगरपालिका व नगर पंचायतीला वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी १२७ कोटीचा निधी शासनातर्फे वितरीत करण्यात आला. मात्र यातून भद्रावती नगर पालिकेला जाणीवपूर्वक वगळण्यात आले. हा भद्रावतीकरांवर अन्याय असून शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२७ कोटी पैकी तब्बल ७२ कोटी रुपये स्वत:च्या क्षेत्रात वाटले. निधी वाटपात दुजाभाव करणे बरोबर नसल्याचा आरोप करीत शासनाने भद्रावती नगरपालिकेला त्वरीत निधी द्यावा, अन्यथा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राजू गैनवार यांनी दिला.सन २०१५-१६ या वर्षासाठी राज्य शासनातर्फे वैशिष्टये पूर्ण कामासाठी अनुदान योजने अंतर्गत निधीचे वाटप करण्यात आले. यात चंद्रपूर महानगर पालिका ४० कोटी, बल्लारशाह ३० कोटी, बल्लारपूर पोलीस ठाण्यासाठी १० कोटी, बल्लारपूर क्रीडा संकूल ५ कोटी, मूल २० कोटी, गडचांदूर २ कोटी, वरोरा ३ कोटी, चिमूर २ कोटी, राजुरा १ कोटी, पोंभूर्णा ५ कोटी, पोंभूर्णा क्रीडा संकूल २ कोटी, सावली २ कोटी, ब्रह्मपुरी ५ कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. मात्र भद्रावती नगर पालिकेचा प्रस्ताव असताना सुद्धा पालिकेला एकही रुपयाचा निधी देण्यात आला नाही. त्यामुळे या शहरावर शासनाचा अन्यायच झाला आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भद्रावती शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे आयुधनिर्माणी, एनटीपीसी वेकोलिच्या भूमीगत, खुल्या कोळसा खाणी, तसेच वरदविनायक गवराळा मंदिर, भद्रनाग स्वामी, जैन धर्मियांचे पार्श्वनाथ मंदिर, बौद्ध धर्मियांचे बुद्ध लेणी, असे त्रिवेणी संगमाने वसलेले हे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. नगरसेवक राजू गैनवार यांनी पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे निधी न मिळण्याच्या संदर्भात चौकशी केली असता, ही माहिती मिळाली. निधी अभावी शहरातील विविध कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरीत १५ दिवसात भद्रावती नगर पालिकेला निधी द्यावा अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू गैनवार यांनी दिला. पालकमंत्र्यांनी याची दखल घेण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)