रावसाहेब दानवे : विदर्भ निर्मितीसाठी शासन सकारात्मक मूल : केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुष्काळाचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपये मदत वितरीत केली जाणार आहे. गुरांना चारा, पिण्याचे पाणी, कर्जाचे पुर्नगठन, वीज बिल स्थगिती व विद्यार्थी फी माफी आदीची पूर्तता करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमनाथ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया आदी उपस्थित होते.रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, केंद्र शासन छोट्या राज्याच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असून विदर्भ निर्मितीच्या पाठिशी आहे. मात्र अभ्यासपूर्व स्थिती जाणल्यानंतरच निर्णय घेतला जाईल,.भाजपाने संघटन पर्व जाहीर केले असून त्याची ४ भागात विभागणी केली आहे. पहिल्या विभागात सदस्य नोंदणीमध्ये एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. यात एक कोटी ५ लाख सदस्य नोंदणी झाले आहे. दुसऱ्या विभागात घरी जाऊन त्याची ओळख करणे, तिसऱ्या विभागाात प्रशिक्षण असून राज्यात ७०० प्रशिक्षण वर्ग घेऊन एक लाख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार तर चवथ्या विभागात निवडणुका असून केंद्र, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर संघटनात्मक निवडणूक घेऊन भाजपा पक्ष समक्ष करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा, विदर्भ व प. महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून सरासरी पेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडल्यावरच दुष्काळ जाहीर केला जात होता. मात्र सरकारने निकष बदलविला असून तो ३३ टक्क्यावर आणला आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदारसुद्धा गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून गोसीखुर्द प्रकल्पाला गती देण्याचे काम भाजप सरकार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. नवे जिल्हे अथवा तालुके निर्मितीचा कसलाही प्रस्ताव सध्यातरी राज्य सरकारपुढे नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)
सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
By admin | Updated: September 1, 2015 00:44 IST