मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शाळेतील एकूण क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. सोडत निघल्यानंतर मुलांना नामाकिंत शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.
गंजवार्डात दुर्गंधीने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : येथील भाजीबाजार असलेल्या गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.
दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
शहरात स्वच्छता मोहीम राबवावी
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्र्कारही बंद करण्यासाठी मनपाने निर्देश द्यावेत. या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नि:शुल्क वाहनतळ निर्माण करावे
चंद्रपूर : विविध भागात वाहनतळ नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने शहरात वाहनतळ निर्माण करण्याची मागणी आहे.
प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना नोकरी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अनियंत्रित वाहनांवर कारवाई करा
चंद्रपूर : पठाणपुरा, नागपूर रोड, बल्लारपूर रोड, तुकूम, दुर्गापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषत: भरधाव वेगाने वाट्टेल तशी वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. एवढेच नाही, तर रस्त्याच्या वळणांवर वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा वाहनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आयुक्तालय कार्यालय निर्माण करा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महापालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या व नगर विस्तार वेगाने वाढत आहे. त्यामुळे अन्य शहराच्या धर्तीवर चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.