लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनाने चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात असताना बायपास मार्गावरील डीएएड कॉलेजजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाहन पलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक गुप्ता रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावरून खाली कोसळले. या अपघातात अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार (२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा. बालाजी वाॅर्ड बल्लारपूर हे गंभीर जखमी झालेत व भुवन गजभिये (२१) रा. राजुरा किरकोळ जखमी झाला. चंद्रपूर शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे व त्यांची चमू लगेच तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना तात्काळ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविले. तसेच क्रेनच्या सहाय्याने चारचाकी वाहन काढण्यात आले. वृत्त हाती येईपर्यंत दोघांची प्रकृती गंभीर असून एका युवकाला किरकोळ जखमी असल्याने सुटी देण्यात आली, अशी माहिती आहे. अपघातातील क्षतीग्रस्त झालेले वाहन बल्लारपुरातील सुभाष तोगरवार यांच्या मालकीचे होते.