अपक्ष नगरसेवक जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व भाजपचे नितीन कटारे हे चार नगरसेवक अपात्र झाल्याने चिमूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
चिमूर नगर परिषदच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तीन नगरसेवकांनी भाजपशी आघाडी करून आमदार बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन होती. दि १० एप्रिल २०१८च्या सर्वसाधारण सभेत चिमूर पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरण कार्यान्वित यंत्रणा म्हणून हस्तांतरित करण्यासाठी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश पक्षाने जारी केला होता. परंतु भाजप आघाडीतील जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व नितीन कटारे यांनी पक्षादेशाचे झुगारला. त्यांना १९६५ च्या कलम १६ व १९८६ च्या कलम (३) (१) (अ) व कलम ७ नुसार अपात्र ठरविण्याबाबतची तक्रार गटनेत्या छाया कंचर्लावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ३ ऑगस्ट २०१९ रोजी निर्णय देत त्या चार नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरुद्ध चारही नगरसेवकांनी मंत्रालयात अपील दाखल केले होते. नगरविकासमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती देऊन प्रकरण सुनावणीस ठेवले होते. ५ मार्च २०२१ला नगर विकास मंत्रालयात अंतिम सुनावणी झाली. यामध्ये जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व नितीन कटारे यांचा अपील अर्ज अमान्य करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दि. ३ ऑगस्ट २०१९च्या आदेशास दिलेली स्थगिती उठविली. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८६ तील कलम (३) नुसार दाखल अर्जाबाबत केलेला पारित केलेला ३ ऑगस्ट २०१९ रोजीचा आदेश कायम ठेवण्यात येत आहे, असा निर्णय दिला.
या निर्णयामुळे ते चार नगरसेवक अपात्र ठरले आहे. पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढता येणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे. चिमूरच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे हे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागाचे आरक्षण बदलले आहे. यातील काहीजण दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची इच्छा बाळगून होते. या आदेशाने त्यांचेही स्वप्न आता भंगले आहे. गटासोबत बंडखोरी करून पक्षाचा आदेश झुगारने त्यांना महागात पडले आहे.