लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनविभागात रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना मागील १५ ते २० महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्याने कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरित देण्याच्या मागणीसाठी विदर्भ वन कामगार संघटनेच्या वतीने वनकामगारांनी मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांना निवेदन दिले.वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. हे सर्व वन कामगार मध्य चांदा वनविभागात काम करतात. वेतनाची मागणी केली तर कामावरून बंद करण्याची धमकी कामगारांना दिली जाते आणि या भीतीपोटी हे कामगार वेतनाविना काम करतात. थकित वेतनाची मुख्य वन संरक्षकाकडे संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. मात्र, या कामगारांना थकीत वेतन न देता कामावरून बंद करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.त्यामुळे कामगारांना थकित वेतन द्यावे तसेच कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, या मागणीसाठी विदर्भ वन कामगार संघटनेच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले.दिवसभर धरणे दिल्यानंतर सायंकाळी कामगारांच्या एका शिष्टमंडळाच्या वतीने मुख्य वनसंरक्षक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. थकित वेतन देण्याचे तसेच कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे प्रमोद गोडघाटे यांनी दिली आहे. या आंदोलनात मध्य चांदामधील वनकामगार मोठया संख्येने सहभागी झाले होते.
थकीत वेतनासाठी वनकामगारांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST