कोठारी : जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात. तर सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या महिलांवर प्राणी हल्ला करुन जीव घेत असतात. अशात मानव-वन्य प्राणी संघर्ष पेटत असतो. यावेळेस मानवास मदतीची गरज असते तर वन्यप्राण्यांना संंरक्षणाची गरज असते. त्याकरिता कोठारी येथे वनकार्यालयात वनविभागाने अति शीघ्र दलाची (आरआरयु) निर्मिती केली आहे. कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करुन त्याचे उद्घाटनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनमंत्र्यांनी आता गावकऱ्यांना वनविभागाच्या अति शीघ्र दलाचा मदतीसाठी आधार असेल. शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी निसंकोच वनविभागाकडे मदतीसाठी आले पाहिजे. राज्यात वने मंत्र्यालयाकडून जंगल शेजारी असणाऱ्या गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना भरीव मदत होत आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात भरघोष मदतीचा निर्णय झाला. शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत असतील तर त्यातही वनविभागातर्फे मदतीची तरतूद केली आहे. रानडुकरांचा हैदोस कमी करण्यासाठी त्यांना ठार मारुन त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी देण्यात येत आहे. जंगलात सरपणासाठी महिला जाऊ नये, यासाठी वनविभाग गॅस कनेक्शनचे वाटप करीत आहे. वन मंत्रालयाने विविध लोकोपयोगी निर्णय घेतल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.अशी शीघ्र दलाची निर्मिती करुन त्याचे कार्यालय व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शीघ्र दलात अत्याधुनिक साधनांचा पुरवठा करण्यात आला असून महत्त्वपूर्ण साहित्यासह कार्यालय सुसज्ज आहे. जंगलाशेजारी विपरीत परिस्थिती निर्माण होताच अती शीघ्र दल त्याठिकाणी कार्यान्वित होऊन अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत गावकऱ्यांना मदत करणार आहेत.कोठारीत वन कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत होती. ती पूर्णत: जीर्ण झाली. त्यामुळे कोठारी वन कार्यालय सध्या मंजूर निवासात आहे. त्यातून वनाचा कारभार सुरू आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना व गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. वनाधिकाऱ्यांना कार्यालयात बसण्यास जागा नसल्याने सरकारी निवासातून देखरेख करतात. ही अडचण पाहून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव वनमंत्र्यालयाकडे पाठवून त्यास मंजूर करवून घेतले. नवीन वनकार्यालयाचे भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. गावातील ज्येष्ठ नागरिक व वनसेवेतून निवृत्त झालेले वनाधिकारी ठाकरे व वनपाल कावळे यांच्या हस्ते वन कार्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी केले तर संचालन शिक्षिका उपलंचीवार यांनी केले तर आभार क्षेत्रसहायक भोवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनाधिकारी हाके, क्षेत्रसहायक भोवरे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
गावकऱ्यांना वनविभागाचा आधार
By admin | Updated: August 22, 2015 01:36 IST