नगराध्यक्षांना निवेदन : अन्याय निवारण समितीचा पुढाकारबल्लारपूर : येथील अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, रवींद्रनगर वॉर्ड, विवेकानंद वॉर्डातील महत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी नगराध्यक्ष छाया मडावी यांना निवेदन सादर करून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून सफाई केली जात नाही. डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डात भूमिगत नालीचे बांधकाम करून बुद्ध विहार परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी मूत्रिघराचे बांधकाम करण्यात यावे. रविंद्रनगर वॉर्डात पथदिव्याची व्यवस्था करून खांब दुरूस्त करावा. शहराच्या अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे. कला मंदिर ते न्यू कॉलनी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात यावे. विद्यानगर वॉर्डातील घरावरून गेलेले विद्युत ताराची पर्यायी व्यवस्था करावी. बचत भवनाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष छाया मडावी यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला शहराच्या विकास आराखड्यात बहुतेक समस्यांचा समावेश करण्यात आला असून विकासाची कामे जलदगतीने केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नत्थू रामटेके, जे.टी. रंगारी, परमानंद भडके, चंद्रशेखर गेडाम, पृथ्वीराज वाळके, गौतम निमसटकर, कपील ठमके, जगदीश गेडाम, उषा लोंढे, रजनी जुमडे, शिल्पा ठमके, शारदा सातपुते यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरातील विविध समस्या सोडवा
By admin | Updated: August 10, 2015 00:38 IST