चंद्रपूर : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेती मशागतीला लागला आहे. शेतीची पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखत टाकण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. मात्र शेणखत मिळत नसल्याने वाट्टेल ती किंमत मोजायला शेतकरी सध्या तयार आहे. विशेष म्हणजे, शराजवळच्या गावातून ग्रामीण भागातील शेतकरी मोठी किंमत मोजून शेणखत शेतात टाकत आहे. दिवसेंदिवस पशुधन झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतीला आवश्यक असलेले शेणखत सध्या मिळणे कठीण झाले आहे. ज्या शेतकर्यांकडे जनावरांची संख्या जास्त आहे. त्याच्याकडे शेणखत आहे. मात्र ते आपल्या शेतात टाकण्यावर भर देत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, मात्र जनावरांची संख्या कमी आहे, अशा शेतकर्यांची मोठी पंचाईत होत आहे. शेणखतावर पर्याय म्हणून काही दिवसांपासून रासायनिक खतांचा मारा शेतात केला जात आहे. यातून उत्पादन वाढत असले तरी, शेताचा पोत कमी होत आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम होत असल्याने रासायनिक खताऐवजी शेणखत वापरण्याचा विचार केला तर शेतकर्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. रासायनिक खतापासून शेतीला वाचविण्याचा निर्धार केलेल्या शेतकर्यांना आपल्या जवळचा पैसा आता शेणखतासाठी वापरावा लागत आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकर्यांकडून पशुधनही कमी होऊ लागले. पूर्वी शासनाच्या कोणत्याही योजना नसतानाही शेतकरी शेतीसोबत पशुपालन करायचे. अनेक शेतकरी दुधाळू जनावरांसोबत भाकड जनावरेही पाळायचे. शासन भाकड जनावरे निरुपयोगी ठरवत असले तरी या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात शेणखत मिळत होते. बदलत्या काळात संकरीत बियाणांसोबत जनावरांचीही फॅशन जन्माला आली. त्यामुळे उत्पन्न वाढत असताना पशुधन कमी झाले. शहराजवळील अनेक शेतकर्यांनी शेती करण्यापेक्षा गोपालन करणे सुरू केले आहे. दुग्धव्यवसायातून ते आर्थिक स्थिती बळकट करीत आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे गोधन असल्याने शेणखत मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्यामुळे हे व्यावसायिक ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेणखत विकत आहे. जो शेतकरी जास्त किंमत देतील त्याला शेणखत देत आहे. अशा परिस्थितीने शेतकरी चिंतेत असल्याचा दिसत आहे. काही शेतकरी वाट्टेल तेवढी किंमत देवून शेणखत करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (नगर प्रतिनिधी)
शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्यांचा कल शेणखताकडे
By admin | Updated: May 27, 2014 00:43 IST