नागरी (रेल्वे) : मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंदी बनविण्याचा प्रयत्न केला.माढेळी पॉवर स्टेशनअंतर्गत नागरीसाठी असलेल्या मेन लाईनवर माढेळी भागाचे १५ ट्रान्सफार्मर जोडल्या गेले. येथे कनिष्ठ अभियंता नाही, कर्मचारी वर्ग अपुरा आहे. यामुळे महावितरणने नागरी परिसर वाऱ्यावर सोडला आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकरी रस्त्यावर उतरले. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विपरीत परिणामाला सामोरे जा, अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. जमावाला पांगविण्यासाठी घटनास्थळावर पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे पोहोचले. जमावाला शांत करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता सराफ, उपकार्यकारी अभियंता नागदेवते यांना घटनास्थळावर बोलविले. पण ते न आल्याने दूरध्वनीवर त्यांच्यासोबत चर्चा करुन दोन दिवसांत असलेली अडचण दूर केल्या जाईल, असे आश्वासन दिले आणि जमाव शांत करण्यास त्यांनी महत्वाची भूमिका निभवली. वास्तविक या महिन्याभरात शेतकऱ्यांना ओलीत करतान न आल्याने शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे करपले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या मोर्चामध्ये दिलीप टिपले, चंद्रशेखर नोकरकर, इस्तेखा पठाण, विनोद वाटमोडे, प्रमोद धात्रक, शरद भलमे, बुरीले, उदयसिंग दीक्षित यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
By admin | Updated: October 7, 2014 23:31 IST