चंद्रपूर: सावली तालुक्यातील सायखेडा येथे गेल्या पंधरवड्यापासून तापाची साथ सुरू आहे. काहींना डेंग्युची लागण झाल्याचे रक्त तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र ही साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणा पूर्णत: अपयश आले आहे. यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना निवेदन देऊन गावात सुरू असलेली साथ आटोक्यात आणण्याची मागणी केली आहे. गेल्या १५ ते २0 दिवसांपासून सायखेडा या गावात तापाची साथ पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून या गावातील १0 ते १५ रुग्णांना उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे, अशी माहिती निवेदनातून देण्यात आली आहे. ६ ते ८ जून या दोन दिवसांच्या कालावधीत ३0 पेक्षा अधिक तापाने फणफणत असलेल्या रुग्णांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी मोमीता तुळशीराम नवघरे (१६) व वैशाली उमाकांत डाखोटे (१६) या दोघींना शासकीय वैद्यकीय अहवालानुसार डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासोबतच श्यामराव टेंभुर्णे यांच्यावरही गडचिरोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सायखेडा येथील मुखरू टेंभुर्णे यांना सुरूवातीला ताप आला. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांनाही डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती आटोक्यात आली नाही. ७ जूनला त्यांचे निधन झाले. असे असले तरी, आरोग्य विभागाकडून हे रूग्ण डेंग्युचेच आहेत, हे अद्यापही मानले जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्राची स्थिती निर्माण झाली आहे. आपले अपयश लपविण्यासाठीे आरोग्य यंत्रणेचा हा खटाटोप असल्याचा आरोप आता नागरिकांकडून व्हायला लागला आहे. गावात साथ पसरली असताना आरोग्य यंत्रणा मात्र या आजारावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू गावात पाठवून रुग्णांवर उपचार करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सायखेड्यातील तापाची साथ रोखण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश
By admin | Updated: June 9, 2014 23:32 IST