उदय गडकरी - सावलीतालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटेगावातील १० आदिवासी कुटुंबातील ५७ गावकऱ्यांची ही कहाणी आहे.स्वातंत्र्य पूर्व काळातील मेटेगाव साधनसंपत्तीने समृध्द व वनवैभवाने नटलेले गाव होते. त्या गावात पारंपरिक पद्धतीने लोखंड तयार करण्याचे काम चालायचे. हे परिसरात मिळत असलेल्या दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते. त्या काळात या गावाची लोकसंख्या ७११ इतकी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र आज केवळ ५७ इतकीच लोकसंख्या असून दहा घरांची वस्ती आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांतही या गावाला जाण्यासाठी शासनाकडून रस्ता मिळाला नाही. हे त्या गावाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. जंगलातून पायवाट असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर दररोज जंगली श्वापदांचा वावर या गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवित आहे. दळणवळणाच्या सोईअभावी अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता अनेक बाबी उजेडात आल्या. मेटेगाव आज ज्या दयनिय परिस्थितीत आहे, त्याकडे पाहून स्वातंत्रपूर्व काळात या गावांमध्ये लोखंड निर्मिती होत असेल याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला असताना तेथे पारंपरिक पद्धतीने लोखंड निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. गावाच्या सभोवताल सुमारे अर्धा कि.मी. अंतरापर्यंत तशा प्रकारच्या लोखंड सदृष्य दगडांचे ढीग आढळून येतात. आढळून आलेल्या दगडांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता लोखंड निर्मिती कशा पद्धतीने करायचे याबद्दल गावकरी अनभिज्ञ आहेत. मात्र शुद्ध लोखंडाच्या निर्मितीनंतर उरलेला मळ किंवा कच्चा माल असावा, असे दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते .आज या गावात आदिवासी समाजाची केवळ दहा घरे असून साध्या प्राथमिक शिक्षणाची सोयही या गावात झाली नाही. अडीच कि.मी. अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु गावाच्या सभोवताल दुसऱ्या गावापर्यंत घनदाट जंगल असल्याने लहान मुलांना शाळेत पाठविणे शक्य नसल्याने गावातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत.
स्वातंत्र्यानंतरही मेटेगावचे नागरिक डांबरी रस्त्यापासून वंचित
By admin | Updated: April 26, 2015 01:48 IST