विद्यार्थ्यांसह गावकरी सहभागी : सामाजिक वनीकरण विभागाचे आयोजनताडाळी : प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये व जनसामान्यांमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने प्रेरित होवून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित जनता विद्यालय ताडाळी तथा सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. यातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात तथा मुख्याध्यापक एम.बी. खुसपरे यांच्या नियोजनात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीची सुरुवात वृक्षपालखीत ठेवलेल्या वटवृक्षाचे पूजन करुन करण्यात आली.विविध फुलांनी सजविलेली आकर्षक वृक्षपालखी, मराठमोळा पेहराव धारन करुन बॅडच्या तालावर नृत्य करणारे लेझीम पथक, वृक्षकलश, हातात घेऊन ‘एक फुल एक झाड, परिसर करु या हिरवागार’, ‘झाडे लावा प्रदूषणाला पळवा’ असे घोषवाक्य उच्चारणाऱ्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. ग्रामपंचायत ताडाळीच्या प्रांगणात वृक्षपालखी खाली ठेवून हरित गणेश वंदना करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक कांबळे, लागवड अधिकारी धांडे, सहायक लागवड अधिकारी अमित साळवे, सरपंच ज्योती आसेकर, मुख्याध्यापक खुसपरे यांनी आपल्या उद्बोधनपर भाषणातून वृक्ष आपला सखा आहे. त्याचप्रमाणे परोपकारी बना असा मोलाचा संदेश दिला. या वृक्षदिंडीत गावकरीही सहभागी झाले. (वार्ताहर)
वृक्षदिंडीने दिला पर्यावरणाचा संदेश
By admin | Updated: August 13, 2015 01:56 IST