गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर ज्यांना रक्ताच्या नात्यांनी धुत्कारले, सख्यासोबत्यांनीही वाळीत टाकले अशा बेवारस वृद्धांच्या जीवनातील काळोख पुन्हा आयुष्याच्या संध्याकाळीही गडदल्याची दुर्दैवी प्रचिती चंद्रपुरात घडली आहे. बेवारस जगणाऱ्या आजारी वृद्धांना सामाजिक कार्यकर्त्यांनी रूग्णालयात दाखल केले असले तरी, उपचारानंतर दुरूस्त झाल्याचा शेरा देऊन पुन्हा त्यांची रवानगी बाहेर केली जाते. अशा तीन वृद्धांना गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील एका महिलेचा बुधवारी सकाळी बेवारसपणे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर अन्य दोघे आजारी रूग्ण मरणासन्न अवस्थेत महाकाली मंदीर परिसरात अखेरची घटका मोजत आहेत.मृत पावलेल्या महिलेचे नाव कळू शकलेले नाही. तिचा एक पाय तुटलेला होता. सुमारे ६५ वर्षे वयाच्या या महिलेला गेल्या आठवड्यात कुणीतरी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार केल्यावरही ती बरी झाली नाही. तरीही तिला डिस्चार्ज देण्यात आला.भाऊराव नामक एका ६५ वर्षीय इसमाला अय्युब कच्छी नामक सामाजिक कार्यकर्त्याने याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तो त्यांना आजारी अवस्थेत आढळला होता. या सोबतच गंगाधर असे नाव सांगणाऱ्या ७० वर्षीय वृद्धालाही अशाच प्रकारे कुणाच्यातरी माध्यमातून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील गंगाधर आणि भाऊराव हे वॉर्ड क्रमांक चार मध्ये तर अज्ञात महिला वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेत होती. तशी नोंदही रूग्णालयात आहे. मात्र या तिघांचीही प्रकृती सुधारण्यापूर्वीच त्यांना चार दिवसांपूर्वी महाकाली मंदीर परिसरात रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने आणून सोडले. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार महिलेला आॅटोने तर गंगाधर आणि भाऊराव यांना रूग्णवाहिकेने आणून सोडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत या तिघांनीही रात्र घालविली. परिसरातील दुकानदारांनी त्यांना खायला दिले होते. कुण्यातरी कणवाळू व्यक्तीने ब्लँकेट्स दिले होते. मात्र यातील महिलेचा बुधवारी पहाटे झोपेतच मृत्यू झाल्याचे सकाळी आढळून आले.या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन झाले असले तरी, अद्यापही कुणी ओळख पटविणारे पुढे आलेले नाही. गंगाधर आणि भाऊराव आजारी अवस्थेत मंदीर परिसरातच विश्रांती घेत आहेत. ‘लोकमत’ने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आजारपणामुळे त्यांना धड बोलताही येत नव्हते. भाऊराव पठाणपुरा येथील तर गंगाधार वरोरा नाका परिसरात राहणारा असल्याचीच माहिती मिळू शकली. या संदर्भात जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरंबिकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
मरणासन्न रूग्ण सोडले बेवारस !
By admin | Updated: December 18, 2014 00:47 IST