गतवर्षीच्या तुलनेत निम्माही जलसाठा नाही शेतकऱ्यांसह नागरिकांच्याही मनात धडकी चंद्रपूरचाही पाणी पुरवठा प्रभावित होणारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा वरूणराजानेही जिल्ह्यावर अवकृपा दाखविली. हवामान खाते लाख काही म्हणत असेल तरी पाऊस आपला लहरीपणा सोडायला तयार नाही. पावसाळ्यातील खरा पावसाचा जुलै महिना सुरू आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. ग्रामीण जलसाठ्यात मुबलक पाणी जमा होऊ शकले नाही. सिंचन प्रकल्पाचीही अवस्था वाईट आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात २० ते ३१ टक्क़े जलसाठा आहे. चंदई, लभानसराड प्रकल्प कोरडे पडले आहे. या महिन्यात जोरदार पाऊस पडला नाही तर पुढे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही पाण्याविना हाल होण्याची शक्यता आहे.यावर्षी खरीप हंगाम आणि निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. प्रारंभी मान्सून येईल, भरपूर पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा दाखविण्यात आली. मात्र वेळ निघून गेल्यानंतरहही मान्सून आला नाही. दरम्यान, जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. आतातरी पाऊस नियमित येईल, अशी आशा वाटली. मात्र पाऊस एन्ट्री करून अचानक गायब झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तो कर्जबाजारी झाला. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णता खचून गेला होता. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मदत मिळाली नाही. मागील दोन वर्षांचे झालेले नुकसान विसरून बळीराजा पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला. हवामान खात्याने यंदा पाऊस सरासरीहून अधिक बरसेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे बळीराजा अत्यंत आनंदात होता. शेतातील अनावश्यक कचरा स्वच्छ करणे, शेणखत टाकणे, शेतात आवश्यक त्या ठिकाणी कुंपणाची व्यवस्था करणे, नांगरणी-वखरणी ही हंगामपूर्व मशागतीचे कामे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात केली. मान्सूनचे आगमन झाल्याबरोबर हवामान खात्याच्या अंदाजाला बळी पडत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांना पाहिजे तसा दमदार पाऊस अद्यापही बरसलेला नाही. मान्सून आल्यानंतर आता नियमित पावसाची रिपरिप सुरू राहील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटायला लागली. मात्र त्यानंतर पुढे पाऊस अचानक गायब झाला आणि कडाक्याचे ऊन्ह पडू लागले. आता जुलै महिना लागला आहे. हा महिना भरपूर पावसाचा असतो. मात्र पाऊस हुलकावणीच देत आहे. याचा परिणाम पाण्याच्या स्रोतावर होत आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत म्हणजेच नदी, नाले, तलाव, बोड्या, विंधन विहिरी यामध्ये पाणी नाही. लहानसहान नद्यांचे पात्र तर अजूनही कोरडेच दिसत आहे. जिल्ह्यात ११ सिंचन प्रकल्प आहेत. हे प्रकल्प अगदी डेंजर लेव्हलवर आहेत. केवळ २०-३० टक्के जलसाठा येथे आहे.यंदाचा जलसाठामागील वर्षी १२ जुलै रोजी असोलामेंढा प्रकल्पात ५०.८० दलघमी जलसाठा होता, यंदा २०.५० दलघमी जलसाठा आहे. घोडाझरी प्रकल्पात मागील वर्षी १२ जुलैला २२.२१ दलघमी जलसाठा होता, यंदा ५.१८ दलघमी जलसाठा आहे. नलेश्वर प्रकल्पात गतवर्षी १०.२३ दलघमी तर यंदा १.२४ दलघमी जलसाठा आहे. चंदई प्रकल्पात गतवर्षी ८.६२ दलघमी पाणी होते, यंदा हा प्रकल्प कोरडा आहे. चारगाव प्रकल्पात मागील वर्षी १३.०३ दलघमी पाणी होते, यंदा ३.६३ दलघमी पाणी आहे. अमलनाला प्रकल्पात गतवर्षी ९.८७ दलघमी तर यंदा ३.७७ दलघमी जलसाठा आहे. लभानसराड प्रकल्पात गतवर्षी ५.५३ दलघमी पाणी होते, यंदा हा प्रकल्प कोरडा आहे. पकडीगुड्डममध्ये मागील वर्षी १.४४ दलघमी पाणी होते, यंदा १.१२ दलघमी पाणी आहे. डोंगरगाव प्रकल्पात ७.४५ दलघमी पाणी होते, यंदा ३.६२ दलघमी जलसाठा आहे. इरईमध्ये मागील वर्षी ११६.९६ दलघमी जलसाठा होता, यंदा ४९.७५ दलघमी पाणी आहे. लालनाला प्रकल्पात गतवर्षी ८.२८ दलघमी जलसाठा होता तर यंदा ३.४० दलघमी जलसाठा आहे. इरई धरणात केवळ ३१ टक्के पाणीइरई धरणातून चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सुमारे साडेचार लाख जनता या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पावसाळ्याच्या जुलै महिन्यातच हे धरण चिंताजनक पातळीवर आहे. आज बुधवारी पाटबंधारे विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार इरई धरणात केवळ ३१.१० टक्केच पाणी आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच दिवशी ६० ते ७० टक्के पाणी या धरणात होते. येत्या काही दिवसात इरई धरण भरले नाही तर चंद्रपूरकरांचा पाणी पुरवठाही प्रभावित होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यातही सिंचन प्रकल्पात ठणठणाट
By admin | Updated: July 13, 2017 00:34 IST