पाच महिन्यांपासून मानधन थकित : पैशाअभावी जगायचे तरी कसे?प्रकाश काळे गोवरीमहाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. पंचायत राजसंस्थेचे बळकटीकरण करून कामामध्ये सुसत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पि.आर.आय. हा उद्देश प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविण्यात आला. त्याअंतर्गत राज्यामध्ये संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही संकल्पना प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. ई-पंचायत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाआॅनलाईन या कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्यात आले.ग्रामपंचायतस्तरावर संगणक परिचालकांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत रेकॉर्ड स्कॅन, ग्रामपंचायतीच्या नोंदी, दाखले देणे व इतर ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे संगणक परिचालकाकडून करवून घेतल्या जात आहेत. मात्र त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. तालुकास्तरावरील संगणक परिचालक संघटना यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. महाआॅनलाईनचे जबाबदार अधिकारी याबाबत मौन बाळगून असल्याने संगणक चालकांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. संगणक आॅपरेटर चालकांचे मानधन काढण्यासाठी जिल्हापरिषदेला कामाचे बिल सादर करणे आवश्यक असते. मात्र महाआॅनलाईनकडून ते बिल सादर का केले जात नाही आणि केले असेल तर संगणक परिचालकांचे मानधन थकवून का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न संगणक परिचालकाकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
महाआॅनलाईनच्या कारभारामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी
By admin | Updated: October 16, 2015 01:29 IST