पदभरतीवरही गोंधळ : महापौर, आयुक्तांना उत्तरच सुचेना !चंद्रपूर : विकास परिषदेबाबबत महापौरांच्या कक्षेत घेतलेल्या बैठकीत नगरसेवकांना डावलून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि भाजप नेत्यांना बोलाविण्यात आले. यावरून बुधवारी झालेल्या आमसभेत नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला. १५ ते २० नगरसेवकांनी याबाबत महापौर व आयुक्तांना जाब विचारला. यासोबतच इतर प्रश्नांवरूनही काही वेळ सभागृहात खडाजंगीही झाली.महानगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी १२ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत चांगलाच गोंधळ होणार आहे, अशी चर्चा मंगळवारीच मनपा वर्तुळात होती. तशीच स्थिती बुधवारच्या आमसभेत निर्माण झाली. २७ आॅगस्ट रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर शहराच्या विकासाबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या विकास परिषदेबाबत एक तातडीची बैठक महापौर राखी कंचर्लावार यांच्या कक्षेत सोमवारी बोलाविण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. मात्र स्थानिक नगरसेवक, मनपाचे सभापती यांना याबाबत सूचनाच दिली नाही आणि बोलाविलेदेखील नाही. आजच्या आमसभेत सर्वप्रथम माजी सभापती नंदू नागरकर यांनी आयुक्तांना याबाबत जाब विचारला. मनपाच्या बैठकीत नगरसेवकांना डावलून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. या पदाधिकाऱ्यांचे मनपामध्ये काय काम, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेता व नगरसेवक संजय वैद्य, सुनिता लोढिया, प्रविण पडवेकर, संदीप आवारी यांच्यासह इतर नगरसेवकांनीही याच मुद्यावरून गोंधळ घातला. मात्र याबाबत महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त सुधीर शंभरकर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला. वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे मनपा हद्दीतील नदी-नाल्यांची वाईट अवस्था होत आहे. याबाबतही मनपा प्रशासनाकडे कोणतेही पाऊल का उचलण्यात येत नाही, असा सवालही वैद्य यांनी उपस्थित केला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आझाद बागेची दूरवस्था झाली आहे. बागेत दररोज सकाळी शेकडो लोक फिरण्यासाठी येतात. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. बागेतील ट्रॅकवर सदैव पाणी साचलेले असते. त्यामुळे त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करत चालावे लागते. बाग स्वच्छ व सुंदर असली पाहिजे. असे असताना ही बाग घाणीच्या विळख्यात आहे, त्यामुळे नागरिकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत नगरसेवक प्रविण पडवेकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. या बागेची लवकरच देखभाल केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी सभागृहाला दिले. (शहर प्रतिनिधी)महापालिकेतील पदभरतीचा विषय संजय वैद्य यांनी सभागृहात उपस्थित केला. २०१२ मध्ये ११९७ पदांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. २०१३ मध्ये शासनाने यातील ८६९ पदांना मंजुरीही दिली. त्यावेळी प्रकाश बोखड हे आयुक्त होते. यावेळी या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यानंतर रवींद्र देवतळेंच्या काळात म्हणजे २०१४ मध्ये २२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. मात्र पदभरतीचा प्रश्न कायमच ठेवण्यात आला. याबाबत मनपाच्या प्रशासकीय स्तरावरुन काहीही हालचाली नाही. याबाबत नगरसेवक संजय वैद्य यांनी रोष व्यक्त केला.
विकास परिषदेवरून आमसभेत खडाजंगी
By admin | Updated: August 27, 2015 01:13 IST