शेखर धोटे म्हणतात : आपला कार्यकाळ इतरांहून चांगलाचचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही संचालकच या बँकेला बदनाम करू पाहत आहेत. आपला चांगला चाललेला कार्यकाळ पहावल्या जात नसल्याने त्यांची ही राजकीय खेळी आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष धोटे यांनी बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे आणि कार्यप्रणालीचे दाखले देत विरोधकांवर टीका केली. यावेळी उपाध्यक्ष प्रभा वासाडे, संचालक संजय सिंगम, मनोहर पाऊणकर, पुंडलिक कढव, संजय तोटावार, अनिल खनके, डॉ. अनिल वाढई, यशवंत दिघोरे उपस्थित होते. आरोपकर्त्या संचालकाचा नामोल्लेख टाळून धोटे म्हणाले, बँकेतील कर्मचारी भरतीमध्ये देवाणघेवाण झाल्याचा आरोप होत आहे. मात्र या आरोपात सहभागी असलेले संचालकच स्वत: भरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या समितीचे सदस्य आहेत. या बँकेत मार्च २००९ मध्ये १३८ आणि आॅगस्ट २००९ मध्ये ९२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नव्या पदांमुळे बँकेवर आर्थिक भार पडला. प्रत्यक्षात २००८ आणि २००९ मधील सरळ सेवा भरतीदरम्यान अनुकंपाधारकांचा हक्क डावलण्यात आला.२००९ मधील भरतीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आजही न्यायालयात सुरू आहे. या काळात स्वत: रवींद्र शिंदे अध्यक्ष होते. मात्र आपल्या कार्यकाळात आपण बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता आणली. त्यासाठी समिती गठीत केली. त्यात बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांसह रवींद्र शिंदे, नंदा अल्लूरवार यांच्यासह अन्य संचालकही सदस्य आहेत. या प्रकरणी कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत. आपला वयैक्तिक विरोध असेल तर तो वैयक्तिक पातळीवर व्हावा, मात्र, शेतकऱ्यांच्या विश्वासाला या बदनामीमुळे तडा जाऊ नये, एवढीच आपली अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
स्वहितासाठी संचालकच करताहेत बदनामी
By admin | Updated: December 13, 2014 22:35 IST