लाभार्थ्यांना शंका : रकमेची अफरातफर झाल्याचा संशयशंकरपूर : शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे अद्यापही लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या रकमेची अफरातफर तर झाली नसावी अशी शंका गावातील लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.शंकरपूरपासून जवळच असलेल्या हिरापूर येथील गोपाल नन्नावरे, मंगरू आदे, चंद्रशेखर नौकरकर, विलास चांदेकर, शेखर आदे, सतीश आदे, संतोष हटोलकर, राजू बावणकर, प्रकाश हटोलकर, वामन बावणकर व इतर सात असे एकूण सतरा लाभार्थ्यांनी घरी शौचालयाचे बांधकाम केले. हे बांधकाम सन २०१४-१५ या वित्त वर्षात केले असून लाभार्थ्यांना अजुनही एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाही. सदर बांधकाम पूर्ण झाले आहे, असे प्रमाणपत्रही ग्राम पंचायतने संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. सदर लाभार्थ्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक, संवर्ग विकास अधिकाऱ्याकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. योजनेतील सर्व निकष पूर्ण केले असल्याने लाभार्थ्यांना धनादेश देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
शौचालयाचे बांधकाम होऊनही धनादेश देण्यास नकार
By admin | Updated: September 2, 2015 00:52 IST