ग्राहकांना भुर्दंड : राजू गैनवार यांचा आंदोलनाचा इशाराभद्रावती : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लावलेले इलेक्ट्रॉनिक वीज मीटर दोषपूर्ण असल्याने ते बदलवून नवीन वीज मीटर लावण्याची मागणी भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दोषपूर्ण वीज मीटरमुळे अनेक ग्राहकांना भरमसाठ बिल येत आहे. तसेच वीज ग्राहकाना सवलतीच्या दरात वीज देण्याची मागणी राजू गैनवार यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वीज मीटर लावल्यानंतर सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल येऊ लागल्याने त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट ढेपाळले आहे. वीज बिलापेक्षा हे मीटर जास्त वेगाने बनविण्यात आले असावे, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण दोषपूर्ण मीटर बदलविण्यात यावे, जिल्ह्यात चंद्रपूर थर्मल पॉवर, धारीवाल पॉवर, वर्धा पॉवर, जी.एस. आर पॉवर स्टेशन आहे. या पॉवर कंपन्यांना जिल्ह्यातून कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. या कंपन्यामुळे उष्णता व प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतो. असे असताना दोषपूर्ण मीटर लावल्याने भरमसाठ बिल येत आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी गैनवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोषपूर्ण वीज मीटर बदलविण्याची मागणी
By admin | Updated: August 29, 2015 01:29 IST