मूल : गडचिरोली-मूल राष्ट्रीय महामार्गावरील आकापूर गावाजवळ असलेल्या वळणावर असलेल्या नाल्यावर कमी उंचीचा पूल बांधण्यात आलेला आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाणी वरून वाहत असल्याने पूर्णत: मार्ग बंद असतो. त्यामुळे आकापूर गावाचा संपर्क तुटतो. पावसाळ्याच्या दिवसात होणारा त्रास टाळण्यासाठी वरील नाल्यावर नवीन मोठ्या उंचीचा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे उपसभापती संदीप कारमवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदन देऊन केली.
तालुक्यातील आकापूर गाव गडचिरोली-मूल राष्ट्रीय महामार्गावर आहे. या मार्गावरून मूलकडे येताना वळणावरील नाल्यावर बऱ्याच वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. मात्र त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाणी वरून वाहत असते. एकप्रकारे पूरच येत असतो. त्यामुळे परिसरातील मूल शहर व तालुक्यातील चिमढा, मरेगाव या गावांचा संपर्क तुटत असतो. कमी पावसातदेखील जनतेला पुराचा सामना करावा लागतो. या गंभीर बाबीकडे लक्ष घालून आकापूर गावाजवळील वळणावर असलेल्या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे उपसभापती संदीप कारमवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. या वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती घनश्याम येनुरकर, न.प.चे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे संचालक अखिल गांगरेड्डीवार उपस्थित होते.