---
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र यातही व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बसस्थानकांवर सोयी उपलब्ध कराव्यात
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना, गडचांदूर, कोरपना, सावली या तालुका मुख्यालयामध्ये तर, बसस्थानकसुद्धा नाही. त्यामुळे येथे सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, शौचालय नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला असलेले पानठेले, हॉटेलसमोर उभे राहावे लागते. बसस्थानकामध्ये सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सिंदेवाहीत डासांचा प्रादुर्भाव वाढला
सिंदेवाही : शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश वॉर्डामध्ये कचराकुंड्याच नसल्याने दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी ज्या इमारतींना वाहनतळ नाही अशा इमारतींवर कारवाई केली होती. यामध्ये काही इमारतधारकांनी वाहनतळाची व्यवस्था केली. मात्र आता परिस्थिती जैसे थे झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकांनी याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.