ध्वनिवर्धक सयंत्राला जोडलेल्या चार, पाच लांबपल्ल्याच्या ध्वनिक्षेपकाद्वारे मोठमोठ्याने गाणी वाजवून परिसर दणाणून सोडण्याचे प्रकार हल्ली हळूहळू वाढू लागले आहेत. गावातील शांतता भंग पावत आहे. याचा गावातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी वर्गांना त्रास होत आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरू असून, शालांत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, तर विद्यापीठाच्याही परीक्षा होऊ घातल्याचे वृत्त आहे. अशा वेळी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आवाजाची मर्यादा न पाळता, साउंड सीस्टिमचे संचालक कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे प्रदर्शन करीत असल्याचे चित्र गावात दिसून येत आहे. गजबजलेल्या निवासी वस्तीची पर्वा न करता, रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर नाचगाणे वाजविले जात असल्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू झाले असून, यावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व अबालवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नियमाप्रमाणे लाऊड स्पीकर वाजविताना परवान्याची आवश्यकता असते, परंतु ग्रामीण भागात कोणतेही साउंड सीस्टिमचे संचालक या भानगडीत न पडता, ट्रॅक्टरवर डीजे चढवून परिसर दणाणून सोडणाऱ्या आवाजाने गावभर फिरताना दिसतात. यामुळे प्रदूषण वाढू लागले असून, यावर त्वरित आळा घालण्याची मागणी केली जात आहे.