धरणे आंदोलन : महाराष्ट्र लोकशाही आघाडीची मागणीचंद्रपूर: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्या करण्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झालीत. तसेच श्रमिकांचे नेते, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ कॉ. अॅड. गोविंद पानसरे यांचाही सनातनी, धर्मांध शक्तीने सहा महिन्यापूर्वी खून केला. त्यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्यावतीने येथील जटपुरा गेट परिसरातील गांधी पुतळ्यासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या दोन घटनांतील आरोपींची प्राथमिक ओळख सांगण्यात आली. परंतु अद्याप या दोन्ही सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही. यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पोलीस अकार्यक्षम सिद्ध झाले आहेत. म्हणून महाराष्ट्र लोकशाही आघाडी तथा विविध सामाजिक संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी आज २० आॅगस्ट रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर दिवसभर धरणे दिले. मारेकऱ्यांना त्वरीत अटक करण्याची जोरदार मागणी केली. याप्रसंगी विविध धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष आणि पुरोगामी सामाजिक संघटनांचे शेकडो महिला- पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते.दुपारी ४ वाजता मारेकऱ्यांना अटक करुन कडक शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात किशोर पोतनवार, रमेशचंद्र दहीवडे, बळीराज धोटे, एस. टी. चिकटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
दाभोळकर व पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा
By admin | Updated: August 22, 2015 01:34 IST