लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील ६ हजार २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करणे सुरूच होते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची परवागनी दिली. त्यामुळे इच्छुकांनी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी केली. २३ डिसेंबरपासून नामांकन दाखल करणे सुरू झाले होते. मात्र, लिंक नसल्याने उमेदवारांची प्रारंभापासूनच तारांबळ उडाली होती. ३१ डिसेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी होणार असून त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या १ हजार ९८१ प्रभागातून ५ हजार १५९ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. यासाठी २ हजार १२८ मतदान केंद्र तयार करण्यात आले. या निवडणुकीत ९ लाख ३५ हजार १७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये सुमारे १५ हजार नवमतदार असल्याचे माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. १८ प्रकारच्या कागदपत्रांसह ऑनलाईन नामांकन दाखल करताना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंगळवारी ऑफलाईन नामांकन दाखल करण्याची परवानगी दिल्याने आज सकाळी ११ वाजतापासून इच्छूकांची प्रचंड गर्दी झाली. घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे अखेरच्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाले नाही. हडस्तीमध्ये सात जागांसाठी ९ नामांकन दाखल झाले.
१५ जानेवारी रोजी फैसलाचंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन दाखल झाले नाही. बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ ९ नामांकन दाखल झाले असून दोन जागांवर निवडणूक होण्याचे संकेत आहे. अन्य ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रणधुमाळी बघायला मिळणार आहे. यासाठी राजकीय पक्षही गुंतले आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपयर्यंत जिल्ह्यात ३ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले होते. बुधवारी उशिरापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.