बल्लारपूर : शाळा- महाविद्यालय आणि प्रशिक्षणाचे विविध वर्ग सुरू होण्याच्या बेतात आहे व काही सुरुही झाले आहेत. या दरम्यान बहुतेक शाळा - महाविद्यालयांनी शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आपापल्या संस्थांच्या जाहिरातीचे बॅनर्स लावून बरीच गर्दी केली आहे. यामुळे सध्या सुटसुटीत दिसणारे शहर बॅनर्सने बरबटलेले दिसत आहे.दहावी आणि बारावीचा निकाल लागला आणि शाळांनी त्यांच्या शाळा- महाविद्यालयातून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोसह बॅनर्स सर्वत्र लावण्याचा जणू सपाटाच सुरू केला आहे. यात, ज्यांना विद्यार्थ्यांचा तोटा नाही, असे म्हटले जाते. अशा इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळाही मागे राहिल्या नाहीत. आमचेच शाळा- महाविद्यालय कसे योग्य व विद्यार्थ्यांची काळजी घेणारे आहे, हे पटवून देण्याचा यातून साऱ्यांचा खटाटोप दिसतो आहे.शाळांची संख्या अमर्याद आणि विद्यार्थी मर्यादित अशी स्थिती आल्यामुळे शाळा- महाविद्यालयांना हे सारे करावे लागत असून गेल्या चार-पाच वर्षांपासून यात अधिक भर पडत आहे. यंदा बॅनर्सची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आढळत आहे.येथील नगर परिषद भवन चौक, रेल्वे चौक, गांधी पुतळा, बस स्थानक परिसर इत्यादी ठिकाणांवर अशा बॅनर्सची गर्दी झाली आहे. कसेही करा आणि विद्यार्थी मिळवा, अशी स्पर्धा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. त्याकरिता विद्यार्थी व पालक यांची मने वळविणे सुरू आहे. बॅनर्स प्रचार हा त्यातीलच एक भाग आहे. (तालुका प्रतिनिधी)
शाळा महाविद्यालयांच्या प्रचार बॅनर्सची गर्दी
By admin | Updated: June 26, 2015 01:14 IST