मूल : तालुक्यातील पिपरी दीक्षित- भजाळी-चकदुगाळा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. शाखा अभियंता चुनारकर यांच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित कंत्राटदार काम करण्यास पुढे धजावत नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत असून अनेकदा अपघातही घडत आहेत.जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित- भजाळी, चकदुगाळा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सन २०१३-१४ या वर्षात मंजूर करण्यात आले. या मार्गावर खड्डेच खड्डेच पडले असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूलने ३ लाख रुपयाचे काम मंंजूर केले. मात्र दोन वर्षे लोटत असतानाही काम पुर्ण झालेले नाही. संबंधित कंत्राटदाराकडे शाखा अभियंता चुनारकर हे कामाकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत असल्याने काम रखडले आहे. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कंत्राटदारामुळे रस्त्याचे काम रखडले
By admin | Updated: December 10, 2014 22:55 IST