आवागमनाचा एकमेव मार्ग : अभियंता, कंत्राटदाराचे दुर्लक्षराजुरा : महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यातच सहा महिन्यांपासून बांधकाम पूर्णपणे ठप्प आहे. याच पद्धतीने बांधकाम सुरू राहिल्यास पुन्हा दोन-तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा फटका व त्रास सामान्य नागरिकांना व वाहन चालकांना सोसावा करावा लागत आहे.माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अथक प्रयत्नाने उड्डाण पुलाची मंजुरी व बांधकाम सुरू झाले होते. या बांधकामाचा खर्च महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून होत आहे. नागपूरपासून दक्षिणकडील राज्यात आवागमनाचा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारो ट्रक या मार्गाने जाणे-येणे करतात. मात्र या मार्गावरील रेल्वे गेट १० मिनीटात बंद होते. गेट उघण्यासाठी २०- २५ मिनीटे वाट पाहावी लागते. त्यामुळे आम जनतेस व वाहन चालकांना गेट उघडण्याची वाट पाहत त्रास सहन करावा लागत आहे.तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. दोन वर्षांत पुलाचे बांधकाम करण्याचा करार करण्यात आला होता. परंतु अद्यापही बांधकाम अपूर्ण आहे. या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्याची देखरेख आहे. कंत्राटदाराकडून वेळेवर बांधकाम करून घेण्याची जबाबदारी अभियंत्याची आहे. बांधकामाचा कालावधी पाहून अभियंता व कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. बांधकामाचा जागेवर विवरण फलक लावणे आवश्यक आहे. तशी तरतुद नियमात आहे. परंतु अभियंता व कंत्राटदार आपला बचाव करण्यासाठी फलक लावणे टाळत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. याच पद्धतीचे बांधकाम सुरू राहिल्यास उड्डाण पूल पूर्ण होण्यास दोन-तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडलेलेच
By admin | Updated: February 26, 2016 01:08 IST