शासन निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक आधारबल्लारपूर : जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. त्यामुळे जंगली जनावरांच्या हैदोसाने शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेतही शासनाने दुप्पट वाढ केली आहे, हे विशेष !जंगली जनावरांच्या हैदोसापायी शेत पिकांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येथील प्रगतीशिल शेतकरी महिपाल आर्य यांनी राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १५ दिवसांपूर्वी दिले होते. त्याचे उत्तर मुनगंटीवार यांच्याकडून आले आहे. जनावरांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत मिळणाऱ्या रकमेत आता दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ ९ जुलै २०१५ पासून लागू झाली असल्याचे त्यांना कळविले आहे. रान डुक्कर, हरिण, सारंग, कुरंग, रानगवा, रोही, निलगाय, माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून शेत पिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास शासननिर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतपिकाचे नुकसान १० हजार रुपये पर्यंत झाल्यास पूर्ण किंमत परंतु, १० हजारापेक्षा जास्त नुकसान झाल्यास ८० टक्के रक्कम (२५ हजार रुपयाचे कमाल मर्यादेत), उस पिकाच्या नुकसानीवर ८०० रुपये प्रती मे.टन प्रमाणे (२५ हजार रुपयाचे मर्यादेत), फळबागसाठी नारळ प्रति झाड ४८०० रुपये, कलमी आंबा प्रती झाड ३६०० रुपये, केळी प्रति झाड १२० रुपयेआणि इतर फळझाडे ५०० रुपये प्रती झाड नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ही वाढ जंगलाला लागून असलेल्या शेती मालक शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून काही प्रमाणात मदत प्राप्त होईल. (तालुका प्रतिनिधी)
जंगली जनावरांच्या हैदोसामुळे होणाऱ्या पीक नुकसान भरपाईत दुप्पट वाढ
By admin | Updated: September 3, 2015 00:36 IST