नागभीड : वेळ सकाळी सव्वा नऊची. नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक भूगर्भातून विचित्र आवाज येऊ लागला. सोबतच मोबाईलच्या व्हॉयब्रेशनसारखा आवाज येऊन जमीन थरथरायला लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली. हा भूकंपाचा धक्का असल्याचे लक्षात येताच सर्वच घाबरून घराबाहेर पडू लागले. एकाचवेळी अनेक गावांत असा प्रकार घडल्याने याची वार्ता क्षणार्धात तालुक्यात तर काही वेळातच जिल्ह्यात पसरली. विशेष म्हणजे, प्रशासकीय यंत्रणेने हा भूकंपाचाच सौम्य धक्का असल्याचे मान्य केले असले तरी खगोल अभ्यासक भूगर्भात खडक फुटून भेगा पडतात व त्यामुळे असा प्रकार घडत असतो, असे सांगत आहे. याबाबत अद्याप कुणीही स्पष्ट सांगायला तयार नाही. असे असले तरी नागरिक या घटनेमुळे कमालीचे दहशतीत होते. रात्री उशिरा असा प्रकार तर घडणार नाही ना, अशी भीतीही नागरिकांच्या मनात कायम होती. ॉनागभीड तालुक्यातील नागभीड, भिकेश्वर, नवखळा, चिखल परसोडी, मांगली, बाम्हणी, मिंथूर, मिंडाळा, नवेगाव पांडव या गावात भूकंपाचा धक्का जाणवला. नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या कामात व्यस्त असताना भूगर्भातून अचानक आवाज यायला लागला. प्रारंभी नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही. काही नागरिक कामात व्यस्त असल्याने त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. त्यानंतर व्हायब्रेशनवर असलेल्या मोबाईल सारखा आवाज होऊन जमीन क्षणभर थरथरायला लागली. नागभीड, भिकेश्वर, मांगली, मिंथूर या गावात तर भिंती हलल्याचा अनेकांना अनुभव आला. त्यानंतर मात्र हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच नागरिक चांगलेच घाबरले. आपापली नियोजित कामे सोडून अनेकजण घराबाहेर पडले. संपूर्ण गावातच हा प्रकार जाणवल्याने हे भुकंपाचे धक्केच असावेत, यावर सर्वांचा विश्वास बसला. काही वेळानंतर तालुक्यातील दहा ते बारा गावात असाच अनुभव आल्याने नागरिकात दहशत पसरली. रिस्टर स्केलवर याची नोंद करण्यात आली नसली तरी रिस्टर स्केलप्रमाणे दोनपर्यंत याची तिव्रता असावी, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत नागभीडचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरपासून ८६ किमी अंतरावर उत्तरेला असल्याचे सांगितले. त्याचा अक्षांश २१.४८.२ तर रेखांश ७८.२९.४ आहे. नागभीडचा अक्षांश २०.३४.४८ तर रेखांश ७९.४१.१ असा आहे. (तालुका प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत भूकंपाचीच चर्चासकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान सर्वप्रथम भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर दुपारी असा प्रकार घडला नाही. मात्र नागभीडसह तालुक्यातील बहुतांश गावात हे धक्के जाणवल्याने संपूर्ण तालुक्यातच दिवसभर भूकंपाचीच चर्चा होती. भूकंप कसा होतो, भूकंपाने काय हानी होऊ शकते, यापूर्वी मोठा भूकंप कुठे आला होता, याची चर्चा पानटपरी व चौकाचौकामध्ये सुरू असल्याचे दिसून आले. रात्री झोपेत पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले तर, या भीतीने रात्री उशिरापर्यंत नागरिक दहशतीतच होते.
भूकंपाने नागरिक धास्तावले
By admin | Updated: December 20, 2014 00:55 IST