वाहतुकीची होतेयं कोंडी : ग्रामपंचायतीला जमले ते नगर परिषदेला जमेल काय?चिमूर : भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या काळात आठवडी बाजार अस्तित्वात आले. अशाच प्रकारचा आठवडी बाजार चिमूर शहरात शुक्रवारी भरविण्यात येत होता. त्या काळात चिमुरात भरणारा बाजार हा बालाजी मंदिराच्या आवारात रिकाम्या जागेत भरायचा. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा व्याप वाढला. आजघडीला हाच बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्यात येत आहे. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगरपरिषद अस्तित्वात येवूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.जिल्हास्थळापासून १०० किमी अंतरावर असलेल्या चिमूर शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत १५ ते २० हजारांच्या घरात आहे. चिमूर तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींसह अडीचशे गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी चिमूर शहरात यावे लागते. त्यामुळे रोज या शहरत लाखो रूपयांची उलाढाल होते. नागरिकांच्या गरजेनुसार चिमूर शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ अस्तित्वात आली. असे असले तरी पुरातन काळापासून निर्माण झालेला आठवडी बाजार आजही अस्तित्वात आहे.शहराचा विस्तार बघता मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. शहराचे सौंदर्यीकरण व्हावे म्हणून चिमूर-वरोरा मुख्य मार्गावर दुतर्फा वाहतुकीसाठी सिमेंट रस्ता निर्माण करण्यात आला. रस्ता वाहतुकीसाठी असला तरी या रस्त्याचा वापर आजही आठवडी बाजार भरवण्यासाठी करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावर भरवण्यात येणाऱ्या बाजारामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांसह वाहनांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. (लोकमत चमू)बाजाराच्या लिलावातून लाखोंचा फायदाआठवडी बाजाराच्या वार्षिक लिलावातून स्थानिक प्रशासनाला लाखो रुपयाचा महसूल जमा होतो. मात्र या महसुलातून व्यापाऱ्यांना व बाजारहाट करणाऱ्यांना लाईट, पाणी यासारख्यासुद्धा सुविधा पुरविण्यात येत नाही. त्यामुळे अंधार पडण्याच्या आतच व्यापाऱ्यांना दुकान बंद करावे लागते. मात्र यात महसुलाचा वापर कुठे होतो हा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांना भेडसावत आहे.पोलीस प्रशासनाचीही बघ्याची भूमिकाशुक्रवारी आठवडी बाजार असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी असते. तर बाजार रस्त्यावर असल्याने अनेक वाहनधारकांना ट्रॅफीक जाममध्ये फसावे लागते. गर्दीचा फायदा घेत अनेक रोडरोमियो तथा पाकीटमार आपले हाथ साफ करतात. मात्र पोलीस प्रशासन धृतराष्ट्रासारखी भूमिका घेत असते.नगरपालिकेने उपाययोजना करावानगर परिषदेची निर्मिती होऊन सहा महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र नगरपरिषदेकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र तत्कालीन सरपंच व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील बाजार तलावात भरवण्यास पुढाकार घेतला व बाजार तलावात भरवला. मात्र पाण्यामुळे सुविधा नसल्याने पूर्ववत रोडवर बाजार आला. आता नगर परिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिमूर शहरातील बाजार भरतो रस्त्यावर
By admin | Updated: April 9, 2016 01:31 IST